आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इव्हीएमवरून राजकीय पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचे दिसत आहे. याचदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी इव्हीएमबाबतच्या सर्व राजकीय पक्षांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत आयोग गंभीर असून निवडणुकीपूर्वी त्या सोडवल्या जातील, असा विश्वास त्यांनी दिला. सोमवारी सर्वपक्षीय बैठकीत इव्हीएमबाबत गंभीर चर्चा झाली. काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची मागणी केली होती.  काही पक्षांच्या मते मतपत्रिकेकडे येणे चांगले नाही. कारण पुन्हा मतदानकेंद्र बळकवले जाण्याचे सत्र सुरू होईल, असे रावत म्हणाले.

बैठकीनंतर रावत यांनी इव्हीएमच्या तक्रारींवर आयोग व्यापक दृष्टीकोनातून पाहत असल्याचे सांगितले. या बैठकीला सर्व सात राष्ट्रीय आणि ५१ राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांचे ४१ प्रतिनिधी सहभागी झाले होते. काँग्रेस, सपा, बसपा, तृणमूल काँग्रेस आणि आपसहित इतर विरोधी पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे, अशी सूचना केली.

काही पक्षांनी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मध्ये काही समस्या असल्याचे म्हटले. सर्व पैलूंचा आयोग विचार करत आहे. याबाबत आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असे रावत यांनी सांगितले. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रिया विश्वसनीय आणि सुलभ होण्यासाठी सकारात्मक उपाय सुचवले आहेत. आयोग यावर विस्ताराने विचार करत असून प्रभावी पद्धतीने ते लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे.

बैठकीत ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्यावरही चर्चा झाली. काही पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला तर काहींनी याला विरोध केला. याविषयावर गहन चर्चा झाली.