‘एक जागा, एक उमेदवार’ या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीदरम्यान उमेदवारांना एकापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात यावी. वकिल अश्विनी उपाध्याय यांनी याच संदर्भात कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. उपाध्याय यांनीही दोन जागांवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी असे आपल्या याचिकेत म्हटले होते.


दरम्यान, उमेदवारांना एकापेक्षा अधिक जागांवर निवणडूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात यावा या मागणीसह आयोगाने हे देखील म्हटले आहे की, एका उमेदवाराने दोन जागांवरुन लढल्याने केवळ सरकारी तिजोरीवरच अनावश्यक ताण येत नाही तर विजेत्या उमेदवारांच्या मतदारांसोबतही अन्याय होतो. त्याचबरोबर दोन्ही जागांवर जर उमेदवार निवडणून आला तर त्याने सोडलेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीचा संपूर्ण खर्च संबंधीत उमेदवाराकडून वसूल करण्यात यावा.

सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करुन घेतली असून याप्रकरणी सहा आठवड्यांत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.