नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेले कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा या पाच विचारवंतांना १७ सप्टेंबरपर्यंत स्थानबद्धतेत ठेवण्यात यावे, असा आदेश बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिला.

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. या पाचही आरोपींचा नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.  मात्र, या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली.

बुधवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने पाचही आरोपींच्या स्थानबद्धतेमध्ये १७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.