एकीकडे अवघा देश माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने शोकसागरात बुडालेला असताना दुसरीकडे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. येथील कुपवाडा आणि बांदिपोरा भागात भारतीय सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरु असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.


जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील करालगंड येथे ही चकमक सुरु असून येथे किती दहशतवादी लपून बसले आहेत याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र, त्यांना भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तसेच बांदिपोरा येथील हाजीन भागातही गोळीबार सुरु असून इथल्या घटनेचीही अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

यापूर्वी कुपवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये गुरुवारी भारतीय हद्दीत प्रवेश करताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामध्ये ४ जवान जखमी झाले होते. यानंतर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवण्यात आली होती. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या ८ बिहार रेजिमेंटने काही दहशतवाद्यांना घुसखोरी करताना पाहिले होते. त्यानंतर जवानांनी त्यांना हटकले तर त्यांनी गोळीबार सुरु केला होता.

या घटनेदरम्यान, सुरुवातीला झालेल्या गोळीबारात ४ जवान जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सीमेवर भारताच्या गुप्तचर यंत्रणा कार्यरत असून त्यांच्या माहितीनुसार, येथे ६०० दहशतवादी लपून बसले आहेत. तसेच संधी मिळाल्यास भारतात घुसखोरी करण्याच्या ते तयारी असल्याचेही सांगण्यात आले होते.

या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, टंगधर सेक्टरमध्ये ७९ दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. तर केरन सेक्टरमध्ये ११७ दहशतवादी लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे.