ग्राम पंचायतींमधील 'सरपंच-पती' संस्कृती मोडीत काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले. राष्ट्रीय पंचायतीराज दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मुलन, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती या विषयावर मार्गदर्शन केले.मोदी म्हणाले, सरपंच-पती संस्कृती सर्वत्र पसरली आहे. कायद्याने महिलांना अधिकार दिले आहेत, तर ते वापरण्याची संधी त्यांनाच मिळालीच पाहिजे. त्यामुळेच सरपंच-पती संस्कृती मोडीत काढली पाहिजे आणि महिला सक्षमीकरणाला मदत केली पाहिजे. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या गळतीवर चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले, गळती रोखण्यासाठी पंचायत संस्थानी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर गावांमधील गरिबी निर्मुलनामध्ये पंचायत संस्थानी योगदान दिले पाहिजे. जर एका वर्षात एका गावामधील पाच गरिबांना गरिबीतून वर आणले, तर देशात केवढा मोठा बदल घडून येईल, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.देशातील अनेक नागरिक आजही गावांमध्येच राहतात. त्यामुळे गावांचा विकास कसा साधायचा, याचा विचार आपण केला पाहिजे. छोट्या गावांमध्ये राहणाऱया लोकांची स्वप्नंही मोठी असतात. त्यामुळे प्रत्येक पंचायत संस्थानी पुढील पाच वर्षांमध्ये आपण गावाचा कसा कायापालट करू शकतो, याचा विचार केला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.