कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (इपीएफओ) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. इपीएफओचा सदस्य एक महिन्यापर्यंत बेरोजगार राहिल्यास त्याला ७५ टक्केपर्यंतची रक्कम काढण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. पैसे काढल्यानंतरही तो आपले खाते सुरू ठेऊ शकतो. श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी इपीएफओच्या विश्वस्तांच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

या योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इपीएफओच्या मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष आणि श्रम मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी सांगितले. याअंतर्गत एक महिन्यापर्यंत बेरोजगार राहिल्यास इपीएफओचा कोणताही सदस्य ७५ टक्केपर्यंतची रक्कम अग्रिम म्हणून काढू शकतो आणि आपले खातेही सुरू ठेऊ शकतो.

इपीएफओ योजना १९५२ च्या तरतुदीनुसार दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास खातेधारक आपली उर्वरित २५ टक्के रक्कम काढून खाते बंद करू शकतो. सध्याच्या स्थितीत कोणताही खातेधारक दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यानंतरच ही रक्कम काढू शकतो.

या नव्या योजनेतंर्गत व्यक्ती आपले पीएफ खाते सुरू ठेऊ शकतो. दुसरी नोकरी मिळाल्यानंतर आपल्या खात्याचा पुर्नवापर केला जाऊ शकतो. पहिल्यांदा ६० टक्के रक्कमच काढता येईल असा प्रस्ताव होता. पण सीबीटीने ही मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवली.

गंगवार म्हणाले की, आम्ही इटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) मॅन्युफॅक्चरर्स एसबीआय आणि यूटीआय म्युच्यअल फंडची वेळ मर्यादाही १ जुलै २०१९ पर्यंत वाढवली आली आहे. इटीएफमध्ये इपीएफओची गुंतवणूक ही ४७,४३१.२४ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे आणि लवकरच ती एक कोटी रूपयांपर्यंत जाईल.