केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता १०० दिवस झालेले आहेत. मात्र अद्यापही हे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना अद्यापही आपल्या मागण्यांवर ठाम असून, केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे त्यांना मान्य नसून, ते रद्द करण्याची त्यांची मागणी कायम आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रतिक्रिया दिली आहे.

“आशा गमावू नका, १०० दिवस झाले आहेत. १०० आठवडे किंवा १०० महिने जरी लागले तरी जोपर्यंत सरकार हे काळे कायदे परत घेत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा तुमच्या साथीने सुरूच ठेवणार आहोत.” असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

या अगोदरही शेतकरी आंदोलनावरून प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलेली आहे, शेतकरी १०० दिवसांपासून संघर्ष करत आहेत. २०० पेक्षा अधिक शेकतरी शहीद झाले आहेत. शेतकऱ्यांजवळ जाऊन चर्चा करणं हे सरकारचं कर्तव्य होतं. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या बलिदानाची थट्टा केली, शेतकऱ्यांचा अपमान केला. मी वचन देते की १०० दिवसंच काय १०० महिने जरी लागले तरी देखी मी शेतकऱ्यांसोबत उभी राहील. असं प्रियंका गांधींनी म्हटलेलं आहे.