काँग्रेसचे माजी अध्यक्ष असणारे खासदार राहुल गांधी अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीबरोबरच सतत घसरण होत असणाऱ्या जीडीपीवरुन सरकारवर सतत निशाणा साधताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार २०२० च्या आर्थिक वर्षात बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांग्लादेश लवकरच भारताला ‘सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी) बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे, असा अंदाज आयएमएफच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील चिंता आणखीन वाढली आहे. याचवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केलीय. नक्की वाचा >> काय म्हणावं? दरडोई उत्पन्नात बांग्लादेश भारताला मागे टाकणार! राहुल यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हणत सरकारला टोला लगावला आहे. "भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे करोना परिस्थिती हाताळली आहे," असं राहुल यांनी ट्विट केलं आहे. Another solid achievement by the BJP government. Even Pakistan and Afghanistan handled Covid better than India. pic.twitter.com/C2kILrvWUG — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 16, 2020 राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भा दिला आहे. त्यांनी एक ग्राफ शेअर केला असून त्यामध्ये भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या ग्राफमध्ये करोनाच्या कालावधीमध्ये बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, चीन आणि भूतानच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारताच्या जीडीपीमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. भारताचा जीडीपी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या जीडीपीपेक्षा अधिक प्रमाणात घसरल्याचे दिसत आहे. या ग्राफमध्ये पुढील वर्षी अफगाणिस्तानचा जीडीपी पाच टक्क्यांनी आणि पाकिस्तानचा जीडीपी केवळ ०.४० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरेल असं या आकडेवारीत सांगितलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मागे जीडीपीच्या प्रमाणात भविष्यात बांग्लादेश लवकरच भारताला मागे टाकणार असल्याचे आयएमएफचा अंदाज आहे. यावरुनच राहुल गांधींनी बुधवारीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. 'ही द्वेषाने भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची कमाई आहे. बांग्लादेश भारताच्या पुढे जाणार आहे,' असा टोला राहुल यांनी बुधवारी लगावला होता.