पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नमो अॅप'वरुन रविवारी भाजपाच्या आमदार-खासदारांशी संवाद साधला. यावेळी, देशातील कानाकोपऱ्यातून खासदार आणि आमदारांनी पंतप्रधानांसमोर आपले म्हणणे मांडले आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन मागितले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी ग्रामविकासावर आपला भर दिला. गाव सर्वसुविधांनी युक्त असावे, त्यासाठी भाजपा नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत असे सांगताना त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावाचा उल्लेख केला. हजारेंचे आदर्श गाव राळेगणसिद्धीपासून काहीतरी शिकायला हवे, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले. त्याचबरोबर नेत्यांना त्यांनी कमीत कमी एका गावामध्ये बदल घडून आणण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्यास सांगितले. यावरून अण्णा हजारेंच्या ग्रामविकास मॉडेलला पंतप्रधानांनी पाठींबा दिल्याचे दिसते. दरम्यान, अनौपचारिक पद्धतीने झालेल्या या संवादात पंतप्रधान म्हणाले, जर खासदारांच्या त्यांच्या मतदारसंघातील ३ लाखांपेक्षा अधिक लोक ट्विटरवर त्यांना फॉलो करायला लागले तर मी याच माध्यमांतून थेट त्यांच्याशी बातचीत करायला तयार आहे. तर आमदारांसाठी जर त्यांच्या मतदारसंघात १-२ लाख लोक ट्विटरवर त्यांना फॉलो करीत असतील तर त्यांच्याशी देखील मी संवाद साधायला तयार आहे. त्यांना वेळ देण्यास जरा उशार होऊ शकतो मात्र, त्यांच्याशी थेट संवाद साधायला मला आवडेल असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींना अनेक 'मोदी मंत्र' दिले. यावेळी पंतप्रधानांनी खासदार आणि आमदारांना मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे औषधोपचार आणि तरुणांच्या रोजगारावर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या. एका खासदाराशी संवाद साधताना मोदी म्हणाले, पहिल्यांदा हृदयाच्या आजारावर उपचारासाठी लाख-दीड लाख रुपये खर्च यायचा. आता हा खर्च खूपच कमी झाला आहे. त्याचबरोबर त्यांना साफ सफाई आणि लसीकरण योजनांवर विशेष लक्ष देण्यास सांगितले. दरम्यान, गावातील प्रत्येक घरात एलईडी बल्ब लावण्यात यावेत. शेतकऱ्यांना सोलर पंप लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, यामुळे त्यांच्या पैशात बचत होईल. त्यांनी गावांमध्ये थेट युरिया पोहोचवण्याचाही सल्ला यावेळी मोदींनी दिला. यामुळे त्यांचे येण्याजाण्याचे पैसे वाचतील. तसेच शेतकऱ्यांना पिकविमा घेण्यासाठीही प्रेरित करायला हवे, असे ते म्हणाले.