दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चाकडून पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून करण्यात आलेली आहे. शिवाय, चिराग पासवान यांच्याबद्दल देखील प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहेत. यावर लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिरग पासवान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

”एखाद्या मुलाबद्दल जे लोक अशाप्रकारची वक्तव्यं करत आहेत, त्यांना स्वतःची लाज वाटायला हवी. मी मांझी यांना माझ्या वडिलांच्या गंभीर प्रकृतीबाबत फोनद्वारे माहिती दिली होती. मात्र तरी देखील ते माझ्या वडिलांना पाहण्यासाठी आले नाही. आता ज्या प्रकारे मांझी माझ्या वडिलांबद्दल बोलत आहेत. रुग्णालयात असताना त्यांनी इतकी काळजी का नाही दाखवली? प्रत्येकजण आता मृत व्यक्तीवरून राजकारण करत आहे. ते जिवंत असताना त्यांची भेट घेण्यासाठी का कुणी कष्ट घेतलं नाही?” असं लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी – हिंदुस्थान अवाम मोर्चाचे मोदींना पत्र

तसेच, चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ”नितीश कुमार हे प्रचाराला विकासाच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठी माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. माझा आग्रह असेल की, पुढील सभेत जेव्हा पंतप्रधान मोदींचा आशिर्वाद घेण्यासाठी जाल तेव्हा माझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांबाबत नक्की विचारून घ्यावं. माझ्या वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मोदीजी त्यांच्या सोबत होते.”

आणखी वाचा- गरज पडल्यास भाजपालाही पाठिंबा देऊ – मायावती

हिंदुस्थान अवाम मोर्चाचे मोदींना पत्र –

हिंदुस्थान अवाम मोर्चाकडून पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले गेले आहे की, ”देशाचे मोठे दलित नेते व आपल्या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले रामविलास पासवान यांचे मागील काही दिवासांअगोदर निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशातील नागरिकांना दुःख झालेले आहे. आज देखील आमच्या सारखे त्यांचे समर्थ त्यांची आठवणीने दुःखी होत आहोत. मात्र, संपूर्ण देशाच्या दुःखापासून वेगळे लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान त्यांच्या अत्यंसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी एका शुटींगमध्ये केवळ हसतखेळतच दिसले नाहीतर, कट-टू-कट शुटींगच्या गप्पा देखील मारत होते. ज्यामुळे रामविलास पासवान यांच्या समर्थक व नातलगांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.”

तसेच, ”रामविलास पासवान यांच्या निधानशी निगडीत असे अनेक प्रश्न आहेत. जे चिराग पासवान यांना कठड्यात उभे करत आहेत. एखादा केंद्रीय मंत्री रुग्णालयात दाखल झालेला असताना, अखेर कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालय प्रशासनाने रामविलास पासवान यांचे मेडिकल बुलेटीन चालवले नाही? कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालय प्रशासनाने उपचार घेत असलेल्या रामविलास पासवान यांना रुग्णालयात केवळ तीन जणांनाच भेटण्याची परवानगी दिली होती? याशिवाय अनेक असे प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर रामविलास पासवान यांच्या समर्थकांसह त्यांच्या नातलगांना जाणून घ्यायचे आहेत. ज्याची चौकशा आवश्यक आहे. तरी आपणास विनंती आहे की, वरील बाबींचा विचार करता रामविलास पासवान यांच्या निधनाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले जावेत. ज्यामुळे सत्य जनतेसमोर येईल.” असे देखील सांगण्यात आले आहे. या पत्रावर हिंदुस्थानी अवाम मोर्चा(सेक्युलर)चे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. दानिश रिजवान यांची स्वाक्षरी आहे.