गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ करण्यात आला असा आरोप सीबीआयचे माजी संचालक आर के राघवन यांनी केला आहे. आर के राघवन यांचं “A Road Well Travelled” आत्मचरित्र प्रकाशित झालं असून यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नरेंद्र मोदींविरोधात कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती.

“माझ्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांची बाजू घेण्यात आल्याचा आरोप झाला. माझ्या फोनवरील संभाषणांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. पण काहीही ठोस न मिळाल्याने त्यांची निराशा झाली,” असं राघवन यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

“२००२ गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींची सलग नऊ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान नरेंद्र मोदींनी तपास अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या १०० पैकी एकही प्रश्न टाळला नाही. संपूर्ण चौकशीदरम्यान ते अत्यंत शांत होते. नऊ तासांच्या या चौकशीत त्यांनी साधा चहादेखील स्वीकारला नाही,” असा खुलासा राघवन यांनी केला आहे. “तपासासाठी नरेंद्र मोदींना गांधीनगरमधील एसआयटी कार्यालयात येण्याची तयारी दर्शवली तसंच सोबत पाण्याची बाटली आणली होती,” अशी माहिती दिली आहे.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना चौकशीसाठी बोलावण्यासंबंधी सांगताना त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, “आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना एसआयटी चौकशीसाठी एसआयटी कार्यालयात यावं लागेल असं कळवलं होतं.इतर कोणत्या ठिकाणी ही चौकशी करणं चुकीचा संदेश देणारं ठरलं असतं. मोदींनी आमच्या निर्णयाचं महत्व समजलं आणि ते एसआयटी कार्यालयात येण्यास तयार झाले”.

आणखी वाचा- “नऊ तासांच्या चौकशीत मोदींनी चहादेखील घेतला नव्हता”

राघवन यांनी मोदी आणि आपल्यामध्ये काही ठरलं होतं असे आरोप होण्याची शक्यता असल्याने एसआयटी सदस्य अशोक मल्होत्रा यांना चौकशी करण्यास सांगितलं होतं. “जवळपास नऊ तास मोदींची चौकशी सुरु होती. संपूर्ण चौकशीदरम्यान नरेंद्र मोदी शांत होते. रात्री उशिरापर्यंत ही मॅरेथॉन चौकशी सुरु होती,” असं राघवन यांनी सांगितलं आहे.

“मोदींनी एकाही प्रश्नाचं उत्तर टाळलं नाही. तसंच उत्तर देताना ते दुर्लक्षितही केलं नाही. जेव्हा मल्होत्रा यांनी त्यांनी लंचसाठी ब्रेक हवा आहे का विचारलं, तेव्हा त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी आपली पाण्याची एक बाटली आणि होती, चहा घेण्यासाठीही त्यांनी नकार दिला,” अशी माहिती राघवन यांनी दिली आहे.

राघवन यांनी मोदींच्या एनर्जीचं कौतुक केलं असून मोदींना थोड्या वेळासाठी विश्रांती घेण्यासाठी तयार करताना खूप प्रयत्न करावे लागले अशी माहिती दिली आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये एसटीआयकडून अंतिम अहवाल सादर करण्यात आल. यामध्ये मोदींसहित ६३ जणांना कोणताही पुरावा न सापडल्याने क्लीन चीट देण्यात आली.

सुप्रीम कोर्टाकडून एसआयटीची स्थापना करत राघवन यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय राघवन सीबीआयच्या प्रमुखपदीही होते. याशिवाय बोफोर्स घोटाळा, २००० दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅच फिक्सिंग, चारा घोटाळा यासारख्या अनेक मोठ्या प्रकऱणांचा तपास राघवन यांच्याकडून करण्यात आला आहे.