नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे भारताची धर्मनिरपेक्ष देश म्हणून असलेली ऐतिहासिक प्रतिमा कमकुवत होणार आहे असे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मेमन यांनी म्हटले आहे. राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळताच मेमन यांनी ही प्रतिक्रिया दिली. “भारत धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असलेला एका सहिष्णू देश आहे. पण भारत त्या मार्गावरुन विचलित झाल्यास त्यांचे ऐतिहासिक स्थान कमकुवत होईल” असे मेमन म्हणाले.

अल्पसंख्यांकांचा छळ करणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशचा समावेश केल्याबद्दल अब्दुल मेमन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोमणा मारला. “बांगलादेश इतका जातीय सलोखा असलेले देश फार कमी आहेत. अमित शाह काही महिने बांगलादेशमध्ये राहिले तर, त्यांना आमच्या देशातील आदर्श स्थिती दिसेल” असे मेमन म्हणाले.

“भारतामध्ये अनेक समस्या आहेत. त्यांच्यामधल्य वादांची आम्ही चिंता करत नाही. पण एक मित्र म्हणून आमच्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होईल असे भारत काही करणार नाही अशी अपेक्षा आहे” असे मेमन म्हणाले.

कर्फ्यू झुगारुन लोक उतरले रस्त्यावर
आसामच्या गुवाहाटी शहरात नागरीकांनी गुरुवारी सकाळी संचारबंदी झुगारुन हिंसक विरोध प्रदर्शन केले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसाम आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये लोकांच्या मनात संताप धुमसत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन संपूर्ण आसाममध्ये तणावाची स्थिती असून लष्कराने गुवाहाटीमध्ये फ्लॅग मार्च केला. गुवाहाटी शहर आंदोलनाचे मुख्य केंद्र असून आसामच्या चार भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. आसाम रायफलच्या जवानांना बुधवारी त्रिपुरामध्ये तैनात करण्यात आले.

नेमकं आसाममध्ये काय घडत आहे?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारतातील राज्यांमध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. ऑल आसाम स्टुडंट युनियन, क्रिष्क मुक्ती संग्राम समितीने लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. संचारबंदी असताना रात्री रस्त्यावर लोकांचे विरोध प्रदर्शन सुरु होते. गुरुवारी सकाळी गुवाहाटीमध्ये लष्कराने फ्लॅगमार्च केला.

मोठया प्रमाणात गाडयांची जाळपोळ करण्यात आली असून भाजपा आणि एजीपी नेत्यांच्या घरावरे हल्ले झाले आहेत. अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल यांनी दिली. दिब्रुगड, साद्या आणि तेजपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर हल्ले करण्यात आले आहेत.