सोशल नेटवर्कींगच्या महाजालात प्रसिद्ध असणाऱया फेसबुकने एक विशेष पेज तयार केले आहे. या पेजमधून फेसबुक इंडियाने देशातील राजकीय नेत्यांशी थेट संवाद (चॅटींग) साधता येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या पेजवरून कोणीही फेसबुक वापरकर्ता नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद यादव आणि अखिलेख यादव यांच्याशी लाईव्ह संवाद साधू शकणार आहे. 'फेसबुक टॉक लाईव्ह'या पेजच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या पेजवरून आपले प्रश्न, दृष्टीकोन आणि आगामी लक्ष्य अशाप्रकारे देशाच्या भवितव्याबाबत कोणता नेता काय करू इच्छितो? या संदर्भात थेट नेत्यांशी बोलण्याची(चॅट) संधी फेसबुककरांना मिळणार आहे. जनतेने विचारलेल्या प्रश्नांचे प्रतिनिधीत्व पत्रकार मधू त्रेहान करणार आहेत.येत्या ३ मार्च ते ८ मार्च २०१४ दरम्यान रात्री ८ ते ९ च्या दरम्यान या पेजवरून नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव आणि अखिलेख यादव यांच्याशी चॅट करता येणार आहे. तसेच या संकेतस्थळावर होणाऱया संवादाचे लाईव्ह अपडेट्सही पाहता येतील.