केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हरयाणा-दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्यांपैकी एका आंदोलक शेतकऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी या शेतकऱ्यानं सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कर्मबीर (वय ५२) असून ते हरयाणातील जींद येथील सिंघवाल गावचे रहिवासी होते. टिकरी बॉर्डरवर आंदोलन करताना सेक्टर ९ जवळ बायपास पार्कमध्ये एका झाडाला त्यांनी स्वतःला लटकवून घेतले. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सरकारवर आरोप करताना कृषी कायदे मागे घेण्यात सरकार तारखेवर तारीख देत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे काळे कायदे कधी रद्द होतील माहिती नाही, जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असंही या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला आहे. या शेतकऱ्याचे कुटुंबीय आल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

दोन आणखी शेतकऱ्यांचा मृत्यू

टिकरी बॉर्डरवरच आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे. यांपैकी एक शेतकरी पंजाबच्या संगरुर आणि दुसरा मोगा जिल्ह्यातील रहिवासी होता. मात्र, अद्याप त्यांच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही. असं सांगण्यात येत आहे की, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकाचं वय ६० वर्षे तर दुसऱ्याचं वय ७० वर्षे होतं.