राजधानी दिल्लीत सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आणि देशातील विविध भागांतून या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा आणि सरकारचे अपयशी ठरलेले चर्चेचे प्रयत्न या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाबाबत ट्विटद्वारे भाष्य केलं आहे. देशभरातील विविध ११ भाषांमधून त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे. देशवासियांनाही माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे. — Narendra Modi (@narendramodi) December 19, 2020 मोदी म्हणाले, "कृषी मंत्र्यांनी शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्यांचा हा विनम्र संवादाचा प्रयत्न आहे. सर्व अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र जरूर वाचावे. देशवासियांनाही माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे." शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करावं यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकारने कृषी क्षेत्राबाबत तयार केलेले कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. यासाठी दिल्लीत सध्याच्या कडाक्याच्या थंडीतही त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आणि देशताली सर्व जनतेपर्यंत सरकारचं म्हणणं पोहोचावं यासाठी कृषीमंत्री तोमर यांनी शेतकऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये ते म्हणतात, "कृषी कायद्यातील सुधारणांबाबत काही शेतकरी संघटनांनी एक भ्रम निर्माण केला आहे. देशाचा कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक शेतकऱ्यांचा भ्रम दूर करणे, प्रत्येक शेतकऱ्यांची चिंता दूर करणे माझे कर्तव्य आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात असत्याची भिंत उभी करण्यासाठीचा कट रचला जात आहे, त्याबाबत सत्य आणि योग्य वस्तुस्थिती आपल्या समोर ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. यावर क्लिक करुन कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना लिहिलेलं पत्र सविस्तर वाचा