कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा संघटनांचा इशारा नवी दिल्ली : नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीच्या टोकाला असलेल्या बुराडी निरंकारी मदानावर शेतकऱ्यांनी एकत्र यावे व त्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल, ही सरकारची अट शेतकऱ्यांनी अमान्य केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच, कृषिमंत्री नरेंद्र तोमर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी रात्री उशिरा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली होती. सोमवारीही अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. त्यात तोमर उपस्थित होते. मात्र, सोमवारी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला नाही. दिल्लीतील दोन टॅक्सी संघटनांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांत शेतकरी आंदोलनावर तोडगा काढला नाही तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. टिकरी, सिंघू तसेच गाझीपूरच्या सीमांवर पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. रविवारी पंजाबमधील ३० शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी संयुक्त किसान मोर्चानेही आंदोलन देशव्यापी करण्याचे आवाहन केले. पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलनात पुढाकार घेतला असला तरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि अन्य राज्यांतील शेतकरीही आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. आंदोलन देशव्यापी होऊ लागले आहे. ३२ वर्षांपूर्वी चौधरी महेंद्रसिंह टिकैत यांनी शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढला होता. आज त्याची पुनरावृत्ती होत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दलालांची फूस असल्याचा आरोप केला जात आहे. पण, इथे कोणी दलाल आहे का तपासा, असे आव्हान ‘स्वराज इंडिया’चे नेते योगेंद्र यादव यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या पत्रकार परिषदेत दिले. या आंदोलनात सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील प्रमुख भारतीय किसान युनियन ही शेतकरी संघटना सहभागी झाली नव्हती पण, त्यांनीही आता गाझीपूरच्या सीमेवर ठिय्या दिला आहे. पंजाब आणि हरयाणातील आणखी काही हजार शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलन तीव्र होऊ लागल्याची माहिती राष्ट्रीय किसान महासंघाचे संदीप गिड्डे पाटील यांनी दिली. दरम्यान, अमित शहा यांनी आपल्याला फोन केला असून सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचा दावा भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बुटा सिंह यांनी केला. केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास दिल्लीला जाणाऱ्या पाचही महामार्गावर ‘रास्ता रोको’ केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी यापूर्वीच दिला आहे. आणखी एका घटकपक्षाचा ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांनीही भाजपवर दबाव वाढवला आहे. राजस्थानमधील राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख व लोकसभेतील खासदार हनुमान बेनिवाल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात व नवे कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. देशाचा अन्नदाता कडाक्याच्या थंडीत आणि करोनाच्या संकटात आंदोलन करत असून केंद्र सरकारसाठी ही बाब योग्य नव्हे. कृषी कायदे रद्द झाले नाही तर ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा इशाराही बेनिवाल यांनी दिला आहे. याच मुद्यावरून शिरोमणी अकाली दलही ‘एनडीए’तून बाहेर पडला होता.