केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरु असतानाच कर्नाटकचे कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

येडियुरप्पा सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले पाटील म्हणाले, “जे शेतकरी आत्महत्या करतात ते भेकड असतात. जो आपली पत्नी आणि मुलांची काळजी घेऊ शकत नाही असा भेकडच आत्महत्या करतो.” कोडागू जिल्ह्यातील पोन्नमपेटमध्ये शेतकऱ्यांच्या एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. पाण्यात पडल्यावर आपल्याला पोहावं लागेल आणि जिंकावं लागेल. भेकड लोकांना या गोष्टीची जाणीव नाही की शेतीचा व्यवसाय किती लाभदायी आहे, पण तरीही ते आपला जीव देतात, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सोन्याच्या बांगड्या घालणाऱ्या एका महिलेचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “मी जेव्हा या महिलेला विचारलं की तिचे हात सोन्याच्या बांगड्यांनी भरले आहेत. यावर ती मला काय म्हणाली, ३५ वर्षांच्या कठीण मेहनतीनंतर धरतीमातेनं मला हे दिलं आहे. म्हणजेच जर शेतीवर निर्भर महिला इतकं काही मिळवू शकते तर इतर शेतकरी ते का नाही करु शकत.”

दरम्यान, कृषी मंत्र्यांच्या या विधानाचा काँग्रेस प्रवक्ते वी. एस. युगरप्पा यांनी निषेध केला आहे. त्यांनी भाजपा नेत्याचं हे विधान शेतकरी समाजासाठी अपमानास्पद असल्याचं म्हटलं आहे. यासाठी कृषी मंत्र्यांनी माफी मागायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

पीटीआयशी बोलताना युगरप्पा म्हणाले, “कोणताही शेतकरी आपलं जीवन संपवू इच्छित नाही. पण पूर आणि दुष्काळासारखी अनेक मोठी कारणं आहेत जी अद्याप आपण सोडवू शकलेलो नाही. मात्र, या समस्यांचं गांभीर्य लक्षात न घेताच कृषी मंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे.”