मोबाईल अॅपद्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर ग्राहकाचा छळ करुन त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे प्रकरण आणखीनच वाढत चालले आहे. आजवर या प्रकरणी चार जणांनी आत्महत्या केल्या होत्या त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. हैदराबादमधील एका ३६ वर्षीय व्यक्तीनं शनिवारी आपलं जीवनं संपवलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, जी. चंद्रमोहन (वय ३६) या तरुणानं याप्रकरणी आत्महत्या केली. चंद्रमोहन एका सुपरमार्केटमध्ये सुपरवाझर म्हणून काम करत होता. गुंडमपोचमपल्ली येथील त्याच्या घरातच तो मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी पेटबाशिराबाद पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम ३०६, ४२०, ३४८ आणि ६७ आयटी अॅक्ट अंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

लॉकडाउनच्या काळात आर्थिक चणचण भासत असल्याने चंद्रमोहनने विविध इन्स्टंट लोन देणाऱ्या अॅप्सवरुन ८०,००० ते १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेतलं होतं. त्याने कर्जाची मुद्दलही चुकती केली होती, मात्र विविध चार्जेसच्या नावाखाली अधिक रक्कम भरण्यास त्याला जबरदस्ती करण्यात येत होती. या त्रासाला कंटाळून त्याने शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पत्नी आणि तीन मुलं घरात नसताना स्वतःच्या खोलीत जाऊन फाशी घेतली. त्याचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर त्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले.

चंद्रमोहनच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की, “तो गेल्या काही दिवसांपासून कर्ज वसूली करणाऱ्यांकडून सुरु असलेल्या छळवणुकीमुळे तणावाखाली होता. लोन अॅप कंपन्यांनी नेमलेले टेलिकॉलर त्याला, त्याच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना फोन करुन याबाबत विचारणा करत होते.” या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस उपनिरिक्षक डी. महेश यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, “चंद्रमोहनने विविध ११ इन्स्टंट लोन देणाऱ्या अॅपच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं. या कर्जाची रक्कम परत करण्यासाठी त्याला दररोज ८ ते १० फोन येत असतं. तसेच त्याच्या कुटुंबियांना आणि मित्र मंडळी, नातेवाईकांनाही अॅप कंपन्यांकडून फोन जात होते. त्यानं आपलं संपूर्ण कर्ज व्याजासहित चुकतं केलं होतं मात्र तरीही त्याचा अधिकच्या रकमेसाठी छळ केला जात होता.

दरम्यान, डिसेंबरमध्ये ईडू श्रवन यादव, किर्नी मौनिका, पी. सुनील आणि संतोष कुमार या चार जणांनी या इन्स्टंट लोन अॅप कंपन्यांकडून होत असलेल्या छळवणुकीला कंटाळून आपलं जीवन संपवलं. तेलंगाणा पोलिसांनी याप्रकरणी जवळपास ५० गुन्हे दाखल केले असून २९ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये तीन चिनी नागरिकांचाही समावेश आहे.