मलेशियाच्या बचाव पथकाने नाव दुर्घटनेतील ३५ इंडोनेशियाच्या निर्वासितांचे मृतदेह मिळविल्याने मृतांचा आकडा ५० वर पोहोचला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवारी सायंकाळी काही जणांचे प्राण वाचविण्यात बचाव पथक यशस्वी ठरले आहे. यातील काही जणांची प्रकृती २४ तासांपेक्षाही अधिक काळ पाण्याखाली राहूनही चांगली आहे. मलेशियाच्या सागरी सुरक्षा संस्थेचे अधिकारी मोहम्मद हमदान म्हणाले की, शुक्रवारी ३५ जणांचे मृतदेह मिळविण्यात बचाव पथकाला यश आले. पुढील काही दिवस हे बचाव कार्य राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिवंत सापडलेल्यांनी नावेवर ८० पेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती दिली आहे. गर्दी असलेली बोट मलेशियावरून इंडोनेशियाकडे परतत असताना समुद्रात १६ किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली होती.