सध्या देशात मंदीचे सावट आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती देखील नाजूक असल्याचे दिसत आहे. यावरून प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. मात्र, आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी देखील देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचे म्हटल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी ‘द हिंदू’ या  वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलायला हवीत. मात्र, या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस रणनीती दिसत नाही.

प्रभाकर हे हैदराबादेतील राइट फोलिया या खासगी कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती खराब आहे. सरकार जरी हे मान्य करत नसले, तरी जी आकडेवारी समोर येत आहे, त्यावरून हे दिसून येते आहे की, अनेक क्षेत्रांवर मंदीचा परिणाम होत आहे.

लेखात हे देखील म्हटले आहे की, या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील जीडीपी दर सहा वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर ५ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, बेरोजगारीच्या दराने ४५ वर्षातील उच्चांक गाठला आहे. देशाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे कुठलीही ठोस रणनीती दिसत नाही. पक्ष नेतृत्वास याची कदाचित याची कल्पना होती, म्हणूनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला नाही. केवळ राजकीय, राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांनाच समोर केल्या गेले, असे देखील प्रभाकर यांनी म्हटले आहे. तसेच, माजी पंतप्रधान नेहरू यांची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत, असं भाजपाने ठरवलं आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असण्यामागे हे देखील एक कारण आहे. नेहरूंची धोरणं राबवायची नाहीत हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय काय याचे उत्तर सरकारकडे नसल्याचे दिसत आहे, असंही प्रभाकर यांनी लेखात सांगितले आहे.