भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कोलकाता येथील दिवस-रात्र कसोटी सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातीन ३ व्यक्तींना पोलिसांनी इडन गार्डन्स परिसरातून अटक करण्यात आल्याचं समजतंय, तर इतर दोन जणांना हॉटेलमधून अटक करण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार, मालिकेतही मारली बाजी

शंभू दयाळ, मुकेश गरे, चेतन शर्मा, अभिषेक सुवालका आणि अयुब अली अशी आरोपींची नावं आहेत. “मैदानाच्या परिसरात काही व्यक्ती सट्टा लावत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन आमचे अधिकारी F1 आणि G1 गेटवर नजर ठेवून होते. यानंतर संधी मिळताच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर त्यांच्या दोन साथीदारांना हॉटेलमधून अटक करण्यात आली”, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ लाख ४० हजार रोखरक्कम, ६ मोबाईल फोन आणि १ लॅपटॉप हस्तगत गेला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिस अधिक चौकशी करत असून आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती, मैदान पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.