कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर जवळ राष्ट्रीय महामार्ग ४ वर काल रात्री एक भयानक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका खासगी बसला आग लागल्याने, या मध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी पाच जणांचा जळून मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे.

बंगळुरूवरून ही बस विजयपुराकडे जात असताना, बसने पेट घेतला. काही समजण्याच्या आतच आगीने संपूर्ण बसला वेढा दिला. ज्यामध्ये बसमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य २७ प्रवासी भाजल्याने गंभीर जखमी झाले. बसला आग लागली तेव्हा बसमध्ये एकूण ३२ प्रवासी होते.

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बसला आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. हिरियुरच्या पोलीस अधीक्षक राधिका यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची स्थानिक पोलिसांनी नोंद करून घेतली असून अधिक तपास सुरू आहे.