विमानात मला जागा मिळावी यासाठी तिघा प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात आल्याच्या घटनेशी अनभिज्ञ असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिले आहे. २४ जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजिजू, त्यांचे खासगी सचिव व जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह हे जम्मू काश्मीरमधील लेहवरुन दिल्लीला येत असताना या तीन मंत्रीमहाशयांना जागा मिळावी यासाठी तिघा प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ शकत नसल्याने अखेरच्या क्षणी एअर इंडियाच्या विमानातून आमची दिल्ली परतण्याची सोय करण्यात आली. पण, यासाठी तिघा प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्याचा प्रकार घडला याची कोणतीही कल्पना आपल्याला नाही. तसे घडले असल्यास हे दुर्देवी आहे, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.