काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांसारख्या पक्षांसाठी देशात घुसखोरी करणारे लोक म्हणजे वोट बँक आहेत. मात्र, आमच्यासाठी हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी काँग्रेससह इतर पक्षांवर सडकून टीका केली. तसेच भाजपाच केवळ असा पक्ष आहे ज्यामध्ये गरीब चहावाल्याचा मुलगा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान होऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापित व्हावी यासाठी भाजपा जोरदारपणे निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. विरोधकांना मात देण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह स्वतः या निवडणुकीची कमान आपल्या खांद्यावर घेणार आहेत.

होशंगाबादमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना यशाचा गुरुमंत्र देण्यासाठी पोहोचलेल्या अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. शाह म्हणाले, देशात ४० लाख संशयीत घुसखोर सापडले आहेत. मात्र, संसदेत राहुल बाबा (राहुल गांधी), दिग्गी राजा (दिग्विजय सिंह) यावरुन गोंधळ घालत आहेत. काँग्रेस, सपा आणि बसपासाठी हे घुसखोर वोट बँक आहेत. मात्र, भाजपासाठी हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे.


दरम्यान, शाह यांनी कार्यकर्त्यांना मध्य प्रदेश मोठा विजय खेचून आणण्याचे आवाहन केले. शाह म्हणाले, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की, आपण मध्य प्रदेशात असा विजय नोंदवायचा की २०१९ नंतर ग्रामपंचायतींपासून संसदेपर्यंत पुढील ५० वर्षांसाठी भाजपाचाच झेंडा फडकला पाहिजे.