शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर नवे कृषी कायदे विनाअट मागे घेण्याची मागणीही त्यांनी एका निवेदनाद्वारे केली.

सोनिया गांधी म्हणाल्या, “अजूनही वेळ आहे मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून तत्काळ विनाअट तिन्ही काळे कायदे मागे घेऊन थंडीत आणि पावसात प्राण सोडणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन संपवावं. हाच राजधर्म असून दिवंगत शेतकऱ्यांप्रती खरी श्रद्धांजली आहे.”

“आंदोलनाबाबत सरकारला गांभीर्य नसल्याने आजवर ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. काही शेतकऱ्यांनी तर सरकारकडून उपेक्षा होत असल्याने आत्महत्येसारखी पावलंही उचलली आहेत. पण असंवेदनशील मोदी सरकारचं हृदय द्रवलं नाही की आजवर पंतप्रधान किंवा त्यांच्या कुठल्याही मंत्र्याच्या तोंडून सांत्वनाचा एक शब्दही निघाला नाही.”

मोदी सरकारनं हे लक्षात ठेवायला हवं की, लोकशाहीचा अर्थ जनता आणि शेतकरी-कामगार यांच्या हिताचं रक्षण करणं आहे. लोकशाहीत जनभावनेची उपेक्षा करणारी सरकारं आणि त्यांचे नेते प्रदीर्घ काळासाठी शासन करु शकत नाहीत. आता हे अगदी स्पष्ट आहे की, सध्याच्या केंद्र सरकारची थकवा आणि पळवा या नीती समोर आंदोलनकारी भूमिपूत्र शेतकरी-मजूर गुडघे टेकणार नाहीत, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.