नेपाळमध्ये भूकंपानंतर परदेशी लोकांच्या मदतकार्य करणाऱ्या पथकांना माघारी पाठवल्यानंतर आता तेथे त्यांच्या लष्कर व पोलिस दलाने मदतकार्य हाती घेतले आहे. नेपाळमधील भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या आता ७५५७ झाली असून त्यात ४१ भारतीयांचा समावेश आहे. दरम्यान बागमती भागात धाडिंग व नवाकोट जिल्ह्य़ात आज सकाळी ६.३९ वाजता भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता ४ रिश्टर होती.
नेपाळ सरकारने भारतातून तसेच इतर ३३ देशांतून आलेल्या मदतकार्य पथकांना परत पाठवले असून नेपाळी लष्कराचे व पोलिसांचे १,३१,५०० जवान मदतकार्यात सहभागी झाले आहेत.
सरकारने सांगितले, की भारताच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ११ पथके परत गेली असून एकूण ५०० जण त्यात सहभागी होते. राष्ट्रीय आपत्ती दलाच्या सोळापैकी चार पथकांना विमानाने चंदीगडला आणण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर तीन पथके काठमांडूतून पाटणा मार्गे परत येत आहेत. इतर ९ पथके एकदोन दिवसांत परत येतील.
कॅनडा, बेल्जियम, फ्रान्स, स्वीत्र्झलड, टर्की, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, पोलंड, भारत या देशांची पथके माघारी जात आहेत, असे नेपाळी लष्कराचे प्रवक्ते जगदीश पोखरेल यांनी सांगितले. परदेशी पथके टप्प्याटप्प्याने माघारी जातील असे सांगून ते म्हणाले, की परदेशातून ४५०० मदत कार्यकर्ते व जवान नेपाळमध्ये आले होते. त्यांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली होती.