भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे, अजातशत्रू, मुत्सद्दी अशी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जनसंघ ते भाजपच्या उभारणीतील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व असलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते पुत्र होते. ९३ वर्षीय वाजपेयी हे ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल होते. ११ जून रोजी श्वसनत्रास होऊ लागल्याने आणि मूत्रपिंडाशी संबंधित विकारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या २४ तासांपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. किशोरवयीन काळापासून स्वातंत्र्यलढ्यात ते तुरुंगात गेले व काही काळ त्यांनी कम्युनिझमशी मैत्री केली. पण नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले व जनसंघात त्यांनी काम केले. संघाच्या मासिकासाठी त्यांनी १९५० मध्ये शाळा सोडली व नंतर त्यांची राजकीय मुळे संघात पक्की झाली. अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. १९९८ मध्ये ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. मे १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या करण्यामागे त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.