भारताचे माजी राष्ट्रपती, काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान अनेकदा त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडीकल बुलेटीन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. परंतू उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली.

शांत आणि मुत्सद्दी स्वभाव, एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान आणि उत्कृष्ट संभाषण कौशल्य या गुणांमुळे प्रणव मुखर्जी यांनी नेहमी संसदेत आपला ठसा उमटवला. १९६९ पासून प्रवण मुखर्जी राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा प्रणव मुखर्जी यांना अनुभव होता. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही काढला, मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.