माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Telangana: Former Union Minister and Congress leader, Jaipal Reddy, passes away in Hyderabad. (File pic) pic.twitter.com/kqbCJAH7jH — ANI (@ANI) July 27, 2019 गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्युमोनिया त्रास होऊ लागला होता. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते मात्र ते अयशस्वी ठरले. जयपाल रेड्डी यांचा जन्म १६ जानेवारी १९४२ रोजी तेलंगण येथील माडगूळ गावात झाला होता. एक धडाडीचे काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली. मात्र १९७५ मध्ये जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांनी काँग्रेस विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जनता दलात गेले. १९८५ ते १९८८ हा काळ ते जनता दलाचे सरचिटणीस होते. मात्र ९० च्या दशकात ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देऊन त्यांना १९९८ मध्ये सन्मानित करण्यात आले होते.