शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मागे घेण्यासाठी आम्ही त्यांचा आवाज झालो आहोत असं वक्तव्य शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केलं आहे. “अकाली दलाने शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मोदी सरकारतर्फे मागे घेतले जावेत म्हणून अपार संघर्ष केला. त्यासाठी आम्ही NDA मधून बाहेर पडलो, पदं सोडली, मोदी सरकारसोबत असलेले सौहार्दाचे संबंध तोडून टाकले. आता अकाली दल हा शेतकऱ्याचा आवाज झाला आहे आम्ही कायमच शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने आहोत” असं वक्तव्य हरसिमरत कौर यांनी केलं. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज भटिंडा येथील तख्त श्री दमदमा साहिब या गुरुद्वाराला भेट दिली. हरसिमरत कौर या शिरोमणी अकाली दलातर्फे होत असलेल्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्त्व करत आहेत. कृषि कायद्यांना विरोध दर्शवतच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर शिरोमणी अकाली दल एनडीएतूनही बाहेर पडलं. आता आम्ही शेतकऱ्यांचा आवाज झालो आहोत असं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं.