जैश-ए-महम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्याविरोधात आता फ्रान्स सरकारने पुढाकार घेतला आहे. फ्रान्स संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे (युएनएससी) अझहर विरोधात पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. अझहरबरोबरच त्याचे कुटुंबियही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे युएनएससीकडे नव्याने सादर करत अझहरवर बंदी आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

‘इकनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार फ्रान्सने अझहर आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध नवीन पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे फ्रान्सकडून लवकरच ‘युएनएससी’समोर सादर केले जाणार आहेत. अझहर आणि त्याच्या दहशतवादी संघटनेवरवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर चीन खोडा घालत असताना फ्रान्सचा हा नवीन प्रयत्न म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. फ्रान्सने हे नवीन पुरावे सादर केल्यास अझहरला आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता वाढली आहे. फ्रान्स सध्या ‘युएनएससीमधील एक महत्वाचा सदस्य असून या परिषदेमधील पी थ्री ब्लॉकमध्ये फ्रान्सचा समावेश आहे. फ्रान्सबरोबर अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांचा मानाच्या पी थ्री ब्लॉकमध्ये समावेश आहे. या ब्लॉकला कायमच जर्मनी, पोलंड आणि बेल्जियमसारख्या देशांबरोबर तीन बीगर युरोपियन देशांचेही समर्थन आहे.

मागील आठवड्यामध्येच फ्रान्सने ‘युएनएससी’च्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यांचा निषेध करण्याचा ठराव संमत करण्याबरोबरच यामध्ये थेट जैशचा समावेश असल्याचेही सांगितले. भारत आता फ्रान्सला अझहरविरोधात नवीन पुरावे गोळा करण्यासाठी मदत करत आहे. तर युएनएससीचे कायमचे सदस्य असणाऱ्या रशियाने वेळोवेळी मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

२०१७ मध्ये अमेरिकेने ब्रिटन आणि फ्रान्सच्या मदतीने संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये अझहरच्या दहशतवादी गटांवर बंदी आणण्याची मागणी करणारा ठरवा मांडला होता. मात्र यामध्ये चीनने खोडा घातल्याने तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. चीन २०१० पासून अझहरवर बंदी आणण्याच्या मागणीला विरोध करताना दिसत आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने २२ तारखेला पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. निषेध ठरवामाध्ये १५ देशांचा समावेश असून यामध्येही चीनदेखील आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे बालाकोट येथील ज्या तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला केला तो तळ अझहर आणि त्याच्या भावामार्फत चावला जात होता. या तळावर दहशवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मैदाने, स्विमिंग पूल, रेसिंग ट्रॅक, फायरिंग रेंज, सोशल मिडिया वॉर रुम अशा अनेक गोष्टी तयार करण्यात आल्या होत्या. येथे प्रशिक्षण दिलेले दहशतवादी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये हल्ले घडवण्यासाठी वापरण्याचा जैशचा इरादा होता. या माहितीच्या आधारे स्वसंरक्षणासाठी भारताने हा हल्ला केल्याचे कारणही भारताला देता आले.