बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आता प्रत्येकजण सर्रास एटीएम कार्डचा वापर करतो. एटीएम कार्डच्या वारंवार वापरामुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार एटीएममधून पैसे काढण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, आता एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध आणण्याचा विचार बँकांकडून सुरु आहे. त्यासाठी काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी दिल्ली स्टेट लेवल बँकर्स कमिटीने (SLBC) बँकांना काही सुचना केल्या आहेत. या सुचनांना मंजुरी मिळाल्यास त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे. एसएलबीसीच्या सुचनेनुसार, दोन एटीएम व्यवहारांमध्ये ६ ते १२ तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.

याचाच अर्थ जर आपण एटीएममधून पैसे काढले तर ६ ते १२ तासांच्या अंतरानंतरच तुम्हाला दुसऱ्यांदा पैसे काढता येतील. या सूचनेवर गेल्या आठवड्यात १८ बँकांच्या प्रतिनिधींनीच्या बैठकीतही चर्चा झाली होती. या व्यतिरिक्त बँकांना इतर पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये अनधिकृतरित्या पैसे काढण्याचा प्रयत्न झाल्यास खातेधारकाला इशारा देण्यासाठी त्याच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवणे तसेच एटीएमच्या सेंट्रलाईज मॉनिटरिंग सिस्टिमचाही पर्याय सुचवण्यात आला आहे. अशा प्रकारची सिस्टिम ओबीसी बँक, स्टेट बँक, पीएनबी, आयडीबीआय आणि कॅनरा बँकांमध्ये सध्या लागू आहे.

यासंदर्भात दिल्ली एसएलबीसी बँकेचे संयोजक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे एमडी आणि सीईओ मुकेशकुमार जैन यांनी सांगितले की, एटीएमशी संबंधित होणाऱ्या बहुतेक फसवणुकीच्या घटना रात्रीच्यावेळी म्हणजेच मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेत होत असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी एटीएमच्या व्यवहारांवर निर्बंध आणणे फायदेशीर ठरू शकते.

एटीएमद्वारे फसवणुकीमध्ये सन २०१८-१९ मध्ये दिल्लीत १७९ फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सुमारे २३३ एटीएम फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. सन २०१८-१९ मध्ये देशभरात ९८० एटीएम फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या वर्षी हा आकडा ९११ इतका होता.