राम मंदिर उभारण्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असतानाही यावर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात आता योग गुरु रामदेव बाबा यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. संसदेत कायदा झाला तरच राम मंदिर उभारणे शक्य होईल असे त्यांनी म्हटले आहे.


रामदेव बाबा म्हणाले, राम मंदिराबाबत निर्णय यायला सुप्रीम कोर्टाकडून उशीर होत आहे. यावर कोर्टाकडून कोणताही मार्ग दिसत नाही. त्यासाठी आता एकच पर्याय उरला आहे. तो म्हणजे राम मंदिराच्या उभारणीसाठी संसदेत कायदा बनवायला हवा, ही प्रक्रिया वैधानिक आहे.

संसदेत कायदा न होता तसेच सुप्रीम कोर्टाने आदेश न देताच जर जनआंदोलनाच्या जोरावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न झाला तर कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही विपरीत घटना टाळताना कोर्टाच्या भरवशावर न राहता संसदेत कायदा व्हावा, असे मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे.

रामदेव बाबा यांच्याप्रमाणेच अनेक भाजपा नेत्यांनीही हे प्रकरण कोर्टात असतानाही त्यावर भाष्य करीत यासाठी संसदेत कायदा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात जाण्याची शक्यताही लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात यावा अशी भुमिका त्यांनी मांडली आहे.