कर्तृत्त्व नसलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या पदांवर बसवून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता मारण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून करण्यात येतो आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. एफटीआयआयमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी एफटीआयआयमधील अध्यक्षपदाच्या नियुक्तीविरोधात राष्ट्रपतींना निवेदन दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अत्यंत योग्य आहे. कर्तृत्त्व नसलेल्या व्यक्ती उच्च पदांवर बसवून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता मारण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे सरकारकडून नुकसान केले जात आहे. ज्या व्यक्ती सरकारपुढे मान हलवण्यास तयार असतात, त्यांनाच वेगवेगळ्या पदांवर बसवले जाते, असाही आरोप त्यांनी केला.