देशात स्वातंत्र्योत्तर काळापासून अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठीच्या निधीची लूट केली गेल्याचा आरोप करत केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले की, गेल्या सहा दशकांत बऱयाच गोष्टी बदलल्या पण देशातील अल्पसंख्याक समाजाचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण झाले नसल्याचे स्पष्ट दिसून येते. मतांच्या राजकारणाचा उद्देश यामागे असून शकतो मात्र यामध्ये मला पडायचे नाही. अल्पसंख्याक समाजाच्या विकासाच्या नावाने मिळणाऱया निधीची लूट माजवण्याचा उद्योग आजवर सुरू होता. निधीचे अयोग्य वाटप आणि दलालांकडून लूट असाच भोंगळ कारभार इतके वर्ष सुरू होता. ही लूटमार थांबवण्याची गरज होती आणि मोदी सरकारने ते करून दाखवले असल्याचा दावा यावेळी नक्वी यांनी केला. अल्पसंख्याकांसाठीच्या निधीचा पैन् पै योग्यरित्या खर्च होईल याची खात्री राखण्याला मोदी सरकार प्राधान्य देत असल्याचेही नक्वी म्हणाले.