पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये असून यावेळी त्यांच्यासमोर भारतीयांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केल्याचं चित्र पहायला मिळालं. नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणेशोत्सव लवकरच येत असल्याचा उल्लेख करत गणेशोत्सवात फ्रान्स मिनी इंडिया होतो असं सांगत भारतीयांचं फ्रान्सशी असणारं नातं सागितलं. काही दिवसांनी आपल्याला पॅरिसमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष ऐकू येईल असं म्हणताच उपस्थित भारतीयांनी जयघोष करण्यास सुरुवात केली. "गणेशोसत्व पॅरिसच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेचा भाग असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. यादिवशी पॅरिस मिनी इंडिया असल्यासारखा दिसतो. याचा अर्थ एक दिवशी आपल्याला पॅरिसमध्येही गणपती बाप्पा मोऱ्याचा जयघोष ऐकू येईल", असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी नरेंद्र मोदींनी भारतीयांना जन्माष्टमीच्याही शुभेच्छा दिल्या. PM Narendra Modi in Paris: I was told that Ganesh Mahotsav has become an important part of Paris's cultural calendar. On this day Paris looks like a mini India, which means in some days we will hear 'Ganpati Bappa Morya' chants here as well pic.twitter.com/cXwtUbwYa0 — ANI (@ANI) August 23, 2019 आज नव्या भारतात भ्रष्टाचार, कुटुंबवाद, भाऊ-पुतण्या वाद, जनतेच्या पैशांची लूट, दहशतवाद या गोष्टींना स्थान नाही. ज्याप्रकारे या गोष्टींना थांबवलं जात आहे ते आधी कधीच झालेलं नाही. नव्या भारतात थकणं आणि थांबण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. "नवं सरकार येऊन जास्त दिवस झालेले नाहीत, फक्त ७५ दिवस झालेले आहेत. १०० दिवसही पूर्ण झालेले नाहीत. या काळात सेलिब्रेशन सुरु असतं. आम्ही मात्र त्या भानगडीत पडलेलो नाही. योग्य धोरणं आणि दिशेने जात आम्ही एकामागोमाग एक मोठे निर्णय घेतले", असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यावरही भाष्य केलं. "तिहेरी तलाक एक अमानवीय कृत्य होतं. पण आम्ही ते संपवून टाकलं. महिलेचा सन्मान करणं गरजेचं आहे. तिहेरी तलाक रद्द केल्यामुळे मिळालेले करोडो महिलांचे आशिर्वाद भारताचं भलं कऱणार आहेत. नव्या भारतात मुस्लिम महिलांसोबत होणारा अन्याय कसा स्विकार केला असता", असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी उपस्थित भारतीयांनी मोदी है तो मुमकीन है अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावर नरेंद्र मोदींनी मोदी है तो मुमकीन है मुळे नाही, तर देशातील जनतेने मतदान दिल्यानेच हे शक्य झालं असं सांगितलं.