पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली असून, भारतानेही तिथे मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत.

चिनी सैन्य मेपासून फिंगर ४ पर्वतरांगांजवळ तळ ठाकून आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठापासून ते ‘रेझांग ला’ जवळच्या ‘रचिन ला’पर्यंतच्या मार्गावरील उंच ठिकाणांवर भारतीय लष्कराने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणांवर ताबा मिळविण्याचा आता चीनचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

चीनने संपूर्ण सैन्यमाघारीची तयारी दर्शवली होती. मात्र, चिनी सैन्याने फिंगर ४ पर्वतरांगांतून कधीच माघार घेतलेली नसून, त्यांनी या पर्वतरांगांच्या वरील भागात सुमारे २ हजार सैनिकांची जमवाजमव केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चिनी सैन्याच्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. तेथील परिस्थिती तणावपूर्ण असून, दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान फक्त ४००-५०० मीटरचे अंतर असल्याचे सूत्रांनी सांगितले.