देवभूमी केरळमध्ये महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमध्ये आलेल्या या महाप्रलयामध्ये आतापर्यंत जवळपास २३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २० हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान भारतीय नौसेना आणि लष्कर जवानांकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु असून लोकांना सुरक्षितस्थळी नेलं जात आहे. सोशल मीडियावर जवानांचं कौतूक केलं जात असून भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेही जवानांचे आभार मानले आहेत. हो मी देवाला पाहिलंय अशा शब्दांत त्याने जवानांचं कौतूक केलं आहे.

‘हो मी देवाला पाहिलंय, सध्या ते आपल्याच देशात अडकलेल्या पूरग्रस्तांचा बचाव करत आहेत’, असं ट्विट गौतम गंभीरने केलं आहे.
दरम्यान केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. नागरिकांचे पुर्नवसन सुरू झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे.

भारतीय हवामान विभागानुसार ८७ वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यात असाच मुसळधार पाऊस कोसळला होता. गेल्या १०० वर्षातील केरळमध्ये पडलेला हा सर्वात मोठा पाऊस आणि पूरग्रस्त स्थिती आली आहे.

या महाप्रलयांमध्ये सर्वात मोठे नुकसान सर्वसामान्य लोकांचे झाले आहे. २३७जणांचा बळी गेला. दहा लाख ७८ हजार नागरिक बेघर झाले आहेत. बेघर झालेल्या लोकांना ५,६४५ सुरशित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राज्यातील ४० हजार हेक्टर पिकांची नासधूस झाली तर २६ हजार घरे जमीनदोस्त झाली आहे. राज्यातील एक लाख किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. तर १३४ पूल खराब झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. केरळमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी आपली सर्व बुकींग रद्द केली आहे. त्यामुळे या क्षेत्राला सर्वात मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन विभागाचा १/१० टक्के वाटा असतो. त्यामुळे आता यामधून सावरण्यासाठी पर्यटन विभागाला आणि राज्याला बराच वेळ लागणार आहे.

पर्यटनाशिवाय चहा, कॉफी, इलाईची आणि शेतीमुळे राज्यला दहा टक्के जीडीपी येतो. शेतीच्या नुकसानामुळे आता राज्याला मिळणाऱ्या उत्पन्न कमी होणार आहे. शेतीच्या क्षेत्राला तब्बल ६०० कोटींचे नुकसान झाले आहे. रस्ते खराब झाल्यामुळे १३,००० कोटींचे तर पूल तुटल्यामुळे ८०० कोटींचे नुकसान झाले आहे.