बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त नेते गिरीराज सिंह यांच्या अटकेला सत्र न्यायालयाने ३ मे पर्यंत स्थगिती दिली. यामुळे सिंह यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अटकेला स्थगिती द्यावी, यामागणीसाटी गिरीराज सिंह यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर पंकज श्रीवास्तव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱयांना पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले होते. त्यांचे हेच वक्तव्य वादग्रस्त ठरल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही बजावली. त्यानंतर गिरीराज सिंह यांच्याविरोधात तीन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक प्रचाराता प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर सर्वात आधी मोहनपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.