‘गो एअर’ या डोमेस्टिक विमान कंपनीने आपल्या १८ विमानांची उड्डाणं सोमवारी अचानक रद्द केल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. यांमध्ये बहुतेक विमाने ही मुंबईहून दिल्लीला जाणारी होती. विमानं आणि क्रू-मेंबर्स उपलब्ध नसल्याने कंपनीवर ही नामुष्की ओढवली. मात्र, यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर प्रवाशांना ताटकळत रहावं लागलं.

‘गो एअर’च्या एअरबस A320 Neo या विमानांमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने आज पुरेशी विमानं उड्डाणांसाठी उपलब्ध होऊ शकली नाहीत. त्याचबरोबर अनेक उड्डाणं ही उशीरानं होत होती. यासाठी वादळी हवामान, कमी दृश्यता त्याचबरोबर सुधारित नागरिकत्व कायद्याला देशातील विविध भागात होत असलेला विरोध यांमुळे गो एअरच्या नेटवर्कमधील अनेक विमानांची उड्डाणे उशीरा होत होती, असे ‘गो एअर”च्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

एअरलाईनच्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शक्य ती पावलं उचलण्यात येत आहेत. त्यासाठी पर्यायी विमानं विमानं उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर मोफत तिकीट रद्द करण्याची तसेच पुन्हा बुक करण्याचा प्रस्ताव या प्रवाशांसमोर ठेवण्यात येत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

एका प्रवाशाने सांगितलं की, जे प्रवाशी मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करणार होते, त्यांना बराच उशीर झाला आहे. मी आजवर कधीही ‘गो एअर’नं प्रवास केकेला नव्हता माझ्या या पहिल्याच प्रवासाठी मला सहा तास वाट पहावी लागली. मात्र, अजूनही विमानाची उड्डाणे होत नाहीत. गेल्या १२ तासांपासून मी अजूनही विमानाची वाटचं पाहतोय. यामुळे बऱ्याच जणांच्या मनात ‘गो एअर’च्या व्यवस्थापकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

एका प्रवासी महिलेनं सांगितलं की, विमानांच्या उड्डाणांचे स्टेटस त्यांना कंपनीनं कळवलं नाही. सकाळी ९.५० पासून उड्डाण सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र, विस्कळीत झालेल्या विमानांबाबत आम्हाला माहिती देण्यात आली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला आहे.