विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर बहुतांश घरांमध्ये हाणामारीचे प्रसंग घडतात. काही वेळा हत्या करण्यासारखे टोकाचे पाऊलही उचलले जाते. पण उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधांच्या एका प्रकरणात असे काहीच घडले नाही. उलट नवऱ्याने स्थानिक पंचायतीचा निर्णय मान्य करुन ७१ मेंढयांच्या मोबदल्यात पत्नी आणि प्रियकराच्या नात्याला मान्यता दिली. मागच्या महिन्यात गोरखपूरच्या चारपानी गावात कुठल्याही वादविवादाशिवाय स्थानिक पंचायतीच्या निर्णयाने हे जोडपे विभक्त झाले. २२ जुलैला सीमा पाल (२५) उमेश पालसोबत (२७) पळून गेली. दोघे हनीमूनवरुन परतल्यानंतर उमेशच्या गावच्या घरात त्यांनी संसार थाटला. चारपानी पंचायतीमध्ये हे प्रकरण पोहोचल्यानंतर गावच्या प्रमुखाने सीमा बरोबर राहायचे असेल तर मेंढयांच्या कळपातील अर्धा हिस्सा तिच्या कायदेशीर पतीला द्यावा लागेल असा आदेश उमेश पालला दिला. पंचायतीचा हा निर्णय पती, पत्नी आणि प्रियकर तिघांनाही मान्य होता. उमेशकडे एकूण १४२ मेंढया होत्या. त्याने कळपातील निम्म्या म्हणजे ७१ मेंढया राजेश पालला दिल्या. हे सर्व बेकायदेशीर असले तरी पंचायतीच्या माध्यमातून या विवाहबाह्य संबंधाला गावात समाज मान्यता मिळाली. मुलाचे वडिल राम नरेश पाल यांना हा निर्णय मान्य नाही. ते शुक्रवारी खोराबार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यांनी राजेश पाल विरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही. या वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या सीमा पाल या महिलेने मला माझ्या पतीसोबत राहायचे नाही. लग्नाच्या पाच वर्षानंतरही मी आई बनू शकली नाही. मी आता आनंदी आहे असे तिने सांगितले.