भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे पुरावे जाहीर झाल्यास पाकिस्तानी लष्कर अडचणीत येऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते. त्यामुळे हे पुरावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते. सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, भारताला युद्धात रस नाही. मात्र, याचा अर्थ आमच्यावर युद्ध लादले गेल्यास त्याला आम्ही शांत बसू, असा होत नाही. या सर्जिकल स्ट्राईकनंतर एकाही देशाने भारताच्या कृतीवर आक्षेप घेतलेला नाही. बहुतांश देशांनी भारताच्या कारवाईचे समर्थनच केले. भारताच्यादृष्टीने हे मोठे यश आहे. सर्जिकल स्ट्राईकसाठी भारताने वेळही जाणीवपूर्वक निवडली. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून  न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेली संयुक्त राष्ट्रांची आमसभा संपल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. याशिवाय, सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर भारताकडून लगेचच अबुधाबीचे राजपूत्र प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. याशिवाय, हल्ल्याच्या आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी अमेरिकेच्या सुसान राईस यांना माहिती दिली. या सगळ्या गोष्टी राजनैतिक रणनीतीचा भाग होता.
अगर हमको कोई छेडेगा, तो हम उसको छोडेंगे नहीं – राजनाथ सिंह
राजनैतिक रणनीतीसाठी आम्ही कोणत्याही अमेरिकेसह कोणत्याही देशावर अवलंबून नाही. ही भारताची जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासूनची रणनीती आहे, इतकेच नव्हे अलिप्तवादही याच धोरणाचा एक भाग होता. गेल्या काही वर्षात आम्ही जगातील वेगवेगळ्या सत्तांशी हातमिळवणी केली आहे. मात्र, याचा अर्थ आम्ही स्वत:च्या निर्णयप्रक्रियेचे नियंत्रण त्यांच्याकडे दिले आहे, असा होत नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. या सर्जिकल स्ट्राईकमुळे प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर येणारी हतबलतेची भावनाही दूर झाली आहे. तसेच यानिमित्ताने वेळ पडल्यास भारत निर्वाणीचा पर्याय अवलंबू शकतो आणि त्यासाठी सुरक्षायंत्रणांना गरजेची असणारी निर्णयाची स्वायत्तता आणि राष्ट्रीय इच्छाशक्ती भारताकडे आहे, असा संदेश जगापर्यंत पोहचला आहे.
मुलायमसिंह यादव यांच्या सल्ल्याने सर्जिकल स्ट्राईक, अमरसिंह यांचा दावा