पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा कुठल्या-कुठल्या क्षेत्राला फायदा होईल त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दिली. उद्योग आणि कर्मचारी दोघांना भविष्य निर्वाह निधीसंबंधी दिलासा देणारी एक मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

उद्योग आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार भविष्य निर्वाह निधीचा भार उचलणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे १२ टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे १२ टक्क्याचा भार सरकार भरणार आहे.

आणखी वाचा- अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी जाहीर केले ‘हे’ अत्यंत महत्वाचे निर्णय

मार्च, एप्रिल आणि चालू महिन्यात सरकार हा भार उचलत आहे. पुढचे तीन महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही सरकारच पीएफचा पैसे भरणार आहे. ३.६७ लाख कंपन्या आणि ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. यामुळे उद्योगांना २५०० कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.