नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रबी पेरणी हंगामापूर्वी शेतकी साहित्य खरेदी करण्याकरता ६ हजार रुपयांचा लाभ मिळण्यासाठी आधार जोडणीकरिता असलेली मुदत सरकारने ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी याबाबतचा निर्णय घेतला.

पीएम- किसान योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी १४ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची रक्कम ३ समान हप्त्यांमध्ये देत असते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने थेट लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.

१ ऑगस्ट २०१९ नंतर या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आधारची जोडणी अनिवार्य करण्यात आली होती. तथापि, आसाम, मेघालय व जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांना मार्च २०२० पर्यंत त्यातून सूट देण्यात आली होती. आधार जोडणीबाबत अनिवार्यतेच्या अटीला वेळ गागत होता आणि त्यामुळे हा निकष आम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत शिथिल केला आहे, असे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. यामुळे, अद्याप आधारची जोडणी न करू शकलेल्या मोठय़ा संख्येतील शेतकऱ्यांना या रकमेचा तत्काळ लाभ मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

पीएम- किसान योजनेंतर्गत सुमारे १४ कोटी शेतकऱ्यांना ८७ हजार कोटी रुपये मिळणार असल्याने ही अद्वितीय योजना आहे, असेही जावडेकर यांनी सांगितले.