काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याबाबत पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे. मंत्र्यांच्या या विधानावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पीओकेबाबत सरकारने निर्णय घ्यावा आपले सैन्य प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला तयार आहे. #WATCH Army Chief, General Bipin Rawat on Union Minister Jitendra Singh's statement, “Next agenda is retrieving PoK & making it a part of India”: Govt takes action in such matters. Institutions of the country will work as per the orders of the govt. Army is always ready. pic.twitter.com/RUS0eHhBXB — ANI (@ANI) September 12, 2019 केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, पाकिस्तानसोबत आता केवळ पीओकेवरच चर्चा होईल. कलम ३७० हटवल्यानंतर आता आमचा पुढचा अजेंडा पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला भारताचा भाग बनवायचे हा आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानवर प्रतिक्रिया देताना लष्करप्रमुख बिपीन रावत म्हणाले, "पीओकेबाबत निर्णय घेण्याचे काम सरकारचे आहे. अशा कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपले सैन्य नेहमी तयार असते." तसेच कलम ३७० हटवल्यानंतर सध्याच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, "काश्मीरच्या लोकांना हे कळायला हवे की हे जे काही होत आहे ते त्यांच्या भल्यासाठीच होत आहे. हे कलम हटवल्यानंतर काश्मीर आता संपूर्ण देशाशी जोडला गेला आहे. याचा अनुभव आता इथल्या लोकांनाही येईल." लष्करप्रमुख म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी ३० वर्षे दहशतवादाचा सामना केला. त्यानंतर आता जेव्हा आपल्याकडे शांतता असते तेव्हा तिथली व्यवस्था कशी असते, हे अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली आहे."