वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आता सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. नव्या नियमांनुसार आता गाड्यांच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप म्हणजेच चमकदार पट्टी लावणं बंधनकारक करण्यात येणार आहे. नियमांनुसार जर कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप लावली नाही तर वाहन चालकांकडून दंड आकारला जाणार आहे. रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सरकार हा विचार करत आहे.

नंबर प्लेटवर रेट्रो टेप लावल्यानं अंधारातही गाडीवर प्रकाश पडल्यास तो चमकू लागतो. त्यामुळे आपल्या मागे किंवा पुढे एखादे वाहन असल्याची माहिती वाहनचालकाला मिळते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय याच आठवड्यात पत्रक काढण्याची शक्यता आहे. वाहन चालकांची सुरक्षा लक्षात घेऊनच हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बोलताना सांगितलं.

काय आहे नियम?
नियमानुसार ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षांमध्ये पुढील बाजूला सफेद रंगाची आणि मागील बाजूला लाल रंगाची रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणं अनिवार्य आहे. या टेपची लांबी २० मीमीपेक्षा कमी असू नये. गाडीचा वेग २५ किलोमीटर प्रति तास असला तरी त्याची चमक ५० मीटर लाबूनही दिसावी, असं नियमांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. यापूर्वी या नियमांमधून ई-रिक्षांना सूट देण्यात आली होती. परंतु ई-रिक्षांचेही वाढते अपघात पाहता त्यांनाही ही टेप लावणं बंधनकारक करण्याच्या निर्णय सरकारनं घेतला आहे.