लग्नाच्यादिवशी नवरदेव विवाहमंडपात दारु पिऊन पोहोचल्यामुळे नवरीमुलीने लग्नाला नकार दिला. त्यामुळे लग्नाचा उत्साह क्षणात मावळला. दारात आलेली वरात माघारी फिरली. मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये ही घटना घडली. नवरीमुलीच्या नकारामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की, मुलीच्या कुटुंबाने वरातीला बंधक बनवून ठेवले होते. वरात दारात पोहोचल्यानंतर स्वागतसोहळा झाला. त्यानंतर नवरदेव दारुच्या नशेत असल्याचे मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. जेव्हा याबद्दल मुलाच्या कुटुंबियांना विचारले तेव्हा त्यांनी नवरदेव दारु पीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवरीमुलीने नवऱ्यामुलाबरोबर लग्न करण्यास नकार दिला. दोन्ही कुटुंबांना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी पोलिसांनी वधू आणि वराचे नाव जाहीर केलेले नाही. लग्नातील भेटवस्तुंच्या देवाण-घेवाणीवरुन दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वरातीसोबत आलेले नातेवाईक, मित्रमंडळी पुन्हा सागरला रवाना झाले. माझ्या मुलीचा निर्णय योग्य होता. तिने इंजिनिअरींगमध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.