उत्तर भारतात काही लग्न सोहळयांमध्ये हवेत गोळीबार करुन आनंद व्यक्त केला जातो. सेलिब्रेशनसाठी केल्या जाणाऱ्या या गोळीबारामध्ये काही वेळा निष्पाप व्यक्तीचा मृत्यू सु्द्धा होतो. उत्तर भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये लग्नसोहळयात सेलिब्रेशन म्हणून केलेल्या गोळीबारात नवरदेवाच्याच वडिलांचा मृत्यू झाला.

उज्जैनपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जागोती गावात ही घटना घडली.  लग्नाची वरात मंदिराच्या दिशेने चालली असताना हा गोळीबार झाला. राघवी पोलीस स्टेशनचे प्रमुख शंकर सिंह चौहान यांनी ही माहिती दिली.

१२ बोअर बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी नवरदेवाचे वडिल विक्रम सिंह यांना जाऊन लागली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.