लग्न सोहळ्यादरम्यान आणखी दारु देण्यास नकार दिल्याने मित्रांनीच नवरदेवाला चाकूने भोसकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. अलिगडजवळच्या एका गावात सोमवारी रात्री लग्न लागल्यानंतर तासाभरातच हा प्रकार घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, अलिगडजवळील पलिमुकिन पूर या गावात हा धक्कादायक प्रकार घडला असून यात २८ वर्षीय बबलू नामक नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर लगेचच बबलू आपल्या मित्रांना भेटायला गेला असताना हा प्रकार घडला. बबलूच्या मित्रांनी आधीच खूप मद्य प्राशन केल्याने ते नियंत्रित स्थितीत नव्हते, असे असतानाही ते बबलूकडे आणखी मद्याची मागणी करत होते. मात्र, आणखी दारु देण्यास आपल्याकडे पैसे नसल्याचे त्यानं मित्रांना सांगितलं. आधीच पुरेशी दारु दिल्याचंही तो मित्रांना म्हणाला.

मात्र, नवरदेव बबलूने आपली दारुची मागणी धुडकावून लावल्याने चिडलेल्या त्याच्या एका मित्राने धारदार शस्त्राने बबलूच्या पोटात वार केला. या हल्ल्यानंतर नवरदेव बबलूला तातडीने रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी मुख्य आरोपी रामखिलाडी याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तर इतर पाच आरोपी फरार झाल्याने त्यांना अद्याप अटक होऊ शकलेली नाही. मात्र, लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल, असे सर्कल ऑफिसर नरेश सिंह यांनी सांगितले.