गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर काँग्रेसने टीका केली असली तरी स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. गुजरातमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार असून मोदींच्या होमग्राऊंडवर निवडणूक होत असल्याने भाजपने कंबर कसली आहे. अमित शहा हे स्वत: निवडणुकीकडे लक्ष देणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचे दाखले देत भाजप निवडणुकीत प्रचार करणार आहे. तर दुसरीकडे काँग्रसनेही गुजरातसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीत अमित शहांना धक्का देत अहमद पटेल यांनी बाजी मारली. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी 'डेली मेल'ला मुलाखत दिली असून यात त्यांनी काँग्रेसच्या प्रचारातील मुद्दे काय असतील यावर भाष्य केले. 'राज्याचे मुख्यमंत्री रुपानी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष जितूभाई वाघानी हे दुबळे नेतृत्व आहे. त्यांच्यात आमच्याशी लढण्याची धमक नसल्यानेच त्यांना दिल्लीतून मोदी आणि अमित शहांना गुजरातमध्ये आणावे लागले. पण आम्ही स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवू. आम्हाला आमच्या पक्षातील राष्ट्रीय नेत्यांची गरजच भासणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल असा सामना रंगणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त असून यावरही सोलंकींनी भाष्य केले. ते म्हणाले की, पक्षाने आता उमेदवाराऐवजी पक्षाच्या प्रचारावर भर दिला आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात लाट असून भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. शेतकरी, महिला आणि दुकानदार नाराज आहेत. यात बदल व्हायला पाहिजे असे सोलंकींनी सांगितले. तिहेरी तलाकबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अल्पसंख्याक समाजावर परिणाम होणार नाही. मोदी दुसऱ्यांना सल्ले देत फिरतात. मग ते स्वतःच्या पत्नीविषयी आणि पदवीविषयी का बोलत नाही असा सवालच त्यांनी उपस्थित केला. भाजपसाठी राजीनामा देणाऱ्या १४ आमदारांवर आम्ही कारवाई करु आणि पुढील सहा वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढवता येणार नाही यासाठी लढा देऊ असे सोलंकींनी म्हटले आहे.